(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देणाचा व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्यातील शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार मागील अनेक वर्षे रत्नागिरीतील ग्रामीण भागात काम अत्यंत निःस्वार्थी भावनेने काम करणारे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेचे मुख्याध्यापक श्री. माधव विश्वनाथ अंकलगे यांना नुकताच जाहीर झाला आहे.
मागील अनेक वर्षे सातत्याने माधव अंकलगे यांनी शाळा विकास आणि विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम आपल्या शाळेत राबविले आहेत. त्यांनी आपल्या नोकरीच्या सेवेत विद्यार्थी गुणवत्ता विकास करतानाच पालक व समाज सहभाग यांच्या माध्यमातून व आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने दोन्ही शाळा ह्या आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त बनविल्या आहेत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक उठाव करत शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यातून ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करत असतात.
विविध स्पर्धा, वाचन – लेखन उपक्रम, स्पर्धा परीक्षा, आपत्कालीन काळातील सेवा, ग्रामीण व शहरी भागातील प्रबोधन, विविध शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार, विद्यार्थ्यांसोबतच स्वतःची शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, साक्षरता अभियानातील सहभाग, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धन, विविध स्पर्धामधील विद्यार्थी सहभाग, त्यांचे यश, पुस्तक प्रदर्शन, लेख प्रकाशन या सर्व बाबीचा विचार करून निवड समितीने त्यांची निवड या पुरस्कारासाठी जाहीर केली होती. परसबाग, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, शिक्षण सप्ताह, यासह विविध शैक्षणिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे. यासह विविध विषयांवर त्यांनी लेखन करतानाच वेगवेगळ्या ठिकाणी करिअर मार्गदर्शन, पालक प्रबोधन, विद्यार्थी मार्गदर्शन, विविध अभियाने, प्रशिक्षणे यामध्ये व्याख्याने दिली आहेत.
जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय निवड समितीने माधव अंकलगे यांच्या कार्याची माहिती घेऊन प्रत्यक्ष शाळेला भेट देत कार्याबद्दलची खातरजमा केली आणि या भेटीदरम्यान त्यांनी शाळा विकास आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास पाहून त्याबाबत प्रभावित होऊन निवड समितीने त्यांची निवड केली आहे.
माधव विश्वनाथ अंकलगे यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारासाठी कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गजानन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करताना शिक्षण विभागाने त्यांची निवड केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाला धन्यवाद दिले. कारण मागील अनेक वर्षे ते सातत्याने विद्यार्थी, शाळा विकास आणि पालक प्रबोधन करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. तसेच शाळेत गुणवत्ता विकास साधताना विविधांगी उपक्रम राबविण्यात पुढाकार घेऊन आदर्शवत कार्य केले आहे. त्यामुळे त्यांना मिळालेला हा पुरस्कार विशेष आहे.
श्री. माधव अंकलगे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

