( खेड/ रत्नागिरी प्रतिनिधी)
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या वादग्रस्त रॅली प्रकरणात माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह तब्बल ३३ जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. खेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांच्या न्यायालयाने गुरुवारी हा दिलासादायक निकाल देत सर्व आरोपींना दोषमुक्त ठरवले. संशयितांच्या वतीने ॲड. अश्विन भोसले यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय कदम हे उमेदवार होते. मतदानाचा दिवस २१ ऑक्टोबर २०१९ रोजी दिवसभर मतदानाची गडबड सुरू असताना सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संजय कदम, वैभव खेडेकर आणि कार्यकर्त्यांनी चारचाकी व दुचाकींवरून कर्णकर्कश हॉर्न वाजवत रॅली काढल्याचा आरोप होता. भरणेतील काळकाई मंदिर परिसरात रात्री सुमारे ८.३० वाजता पोलिसांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी संजय कदम यांनी “रॅली काढणारच, हवे तर गुन्हे दाखल करा” असे ठाम उद्गार काढल्याचा उल्लेख पोलीस तक्रारीत करण्यात आला होता.
आचारसंहितेचे व मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून या ३३ जणांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यात सायली संजय कदम, साहिल संजय कदम, अजय रमेश पिंपरे, तौसिफ शौकत सांगले, प्रमोद पांडुरंग जाधव, धीरज सुनील कदम, ओंकार प्रकाश कदम, पंकज पांडुरंग जाधव, दादू नांदगांवकर, सुनील दत्ताराम चव्हाण, प्रसाद कदम, विनोद तांबे, विजय जाधव, सुरेश मोरे, राहुल कोकाटे, बाबा मुदस्सर, प्रकाश शिगवण, सतीश वसंत कदम, सचिन जाधव, इम्तियाज खलिफ, प्रदोष सावंत, चेतन धामणकर यांचा समावेश होता.
या प्रकरणी २८ साक्षीदारांची सखोल चौकशी करण्यात आली. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व ३३ आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.