(जाकादेवी / वार्ताहर)
महावितरणची सातत्याने येणारी वाढीव बीले तसेच विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने विद्युत खात्याकडून नवीन स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी खालगाव येथील जागरूक तरुणांची ग्रामस्थांमध्ये जनजागृती सुरू असून या जागरूक तरुणांतर्फे खालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश खोल्ये यांना महावितरण खात्याच्या अधिकाऱ्यांना खालगाव ग्रामस्थांबरोबर विशेष महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायतीद्वारे ग्रामसभेचे आयोजन करावे यासाठी लेखी निवेदन देण्यात आले आहे.
वाढीव वीज बिले, सरसकट नवीन स्मार्ट विद्युत मीटर बसवणे, सातत्याने लाईट जाणे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी खालगाव परिसरातील सुमारे २०० ग्रामस्थांच्या सह्यांची निवेदन देण्यात आले आहे. १५ ऑगस्टच्या ग्रामसभेला महावितरण अधिकारी यांना निमंत्रित करण्यात यावे आणि विद्युत खात्याचा शासन निर्णय का आहे? तो ग्रामस्थांना सांगावा, असे सरपंच यांना जागरूक नागरिकांनी निवेदन देऊनआवाहन केले आहे.
या निवेदनावर आपण लवकरच ग्रामसभा घेण्याबाबत सरपंच यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. महावितरणाचा मनमानी कारभार, भरमसाठ बिले वितरित करणे, अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, मजुरांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रकार या बाबींमुळे वाढले आहेत.यासाठी खालगाव परिसरात जनजागृती मोहीम राबवली जात आहे. जागरूक नागरिक चाफे येथील ग्रामीण विद्युत कार्यालयात जाऊन शासन निर्णय नेमका काय आहे ? याविषयी भेट घेणार आहेत. त्यानंतर आंदोलनाची रणनीती ठरणार असल्याचेही जागरूक नागरिकांनी सांगितले.
खालगाव सरपंच यांना निवेदन देण्यासाठी जागरूक नागरिकांमध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय दाजी धामणे, अविनाश पांचाळ, दिलीप धामणे, कृष्णा रामगडे परशुराम धामणे, रविंद्र खोल्ये ,राजेश धामणे, सतीश जाधव उपस्थित होते. विद्युत खात्याच्या मनमानी मोहिमेला विरोध दर्शविणाऱ्या ग्रामस्थांचा आवज बुलंद करण्यासाठी गावांतील वाडीवार सह्या घेण्याची मोहीम जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते विलास सखाराम धामणे यांनी स्वतः वेळ देऊन हाती घेतली आहे.