(जाकादेवी / संतोष पवार)
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष आकाश तांबे यांनी दि. ६ मे रोजी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची पुणे येथे भेट घेऊन संचमान्यता निकषांवर शैक्षणिक व सामाजिक विषयांवर होणारे गंभीर व विघातक परिणाम अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून सकारात्मक दृष्टिकोनातून अनेक मुद्दे उपस्थित केले.
प्रामुख्याने १४ मार्च २०२४ च्या संचमान्यता आदेशानुसार अनेक शिक्षक हे अतिरिक्त होणार असून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची शिक्षण व्यवस्था मोडीत निघणार असल्यामुळे त्यात दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
तसेच राज्यात अनेक शिक्षणाधिकारी हे भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून त्यांची निःपक्षपातीपणे उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, यांसह इतर अनेक शैक्षणिक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. भविष्यात मोफत व सक्तीचे, समताधिष्ठित आणि संविधानिक तत्वप्रणालीचे शिक्षण अबाधित ठेवण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.