(राजापूर)
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे करक येथील अर्जुना धरण ९० टक्क्यांहून अधिक भरले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नदीकाठच्या गावांना तसेच राजापूर शहराला प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अर्जुना धरण हा राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील मोठा पाटबंधारे प्रकल्प असून, दरवर्षी पावसाळ्यात ते पूर्ण क्षमतेने भरते. यंदाही मे महिन्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने धरण भरतीच्या अंतिम टप्प्यात आहे. जून आणि जुलै महिन्यांत पावसाचा जोर कायम राहिल्याने सध्या धरण ९० टक्के भरले असून, हवामान विभागाने पुढील चोवीस तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
धरणाच्या विसर्गामुळे अर्जुना व कोदवली नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, त्याचा फटका करक, तळवडे, पाचल, रायपाटण, चिखलगाव, गोठणे, दोनिवडे, शिळ, उन्हाळे, कोळवणखडी, सौंदळ, आडवली, परटवली, बागवेवाडी या नदीकाठच्या गावांना बसू शकतो.
पाटबंधारे उपविभाग लांजा यांच्यावतीने गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून स्थानिक ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने सर्वांनी संभाव्य पुरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.