(रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावरील झरेवाडी फाट्यानजीक शनिवारी (२८ जून) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजपटी चौथीपाल (वय ५०, रा. उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील ( क्रमांक GJ-03-BV-0108 ) ट्रक घेऊन गोवाकडून मुंबईकडे जात असताना, MH-08-AY-0286 या क्रमांकाची मोटरसायकल पालीकडे निघाली होती. झरेवाडी फाट्यानजीक दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटरसायकलवरील पियुष प्रेमकुमार भारती (वय २४, रा. गयालवाडी, रत्नागिरी) आणि ऋषिकेश शिवराम बदने (वय २४, रा. पांगरी, ता. रत्नागिरी) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांनी भेट दिली असून, पुढील तपास सुरू आहे.