(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोफळी (टी.आर.टी.) धनगरवाडी, ता. चिपळूण येथे छापा टाकून अलोरे-शिरगाव पोलिसांनी एका व्यक्तीस अटक करत ₹१४,००० किमतीचा ५८८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. २७ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजता, प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई राबविण्यात आली. माहितीमध्ये सांगितल्याप्रमाणे, पोफळी धनगरवाडी येथे एक व्यक्ती गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पथक तयार केले.
कारवाईच्या पथकामध्ये पो.हे.का. गव्हाणे (११९७), यादव (१२२३), पोकों. जगदाळे (३१८), फडतरे (१०२८), माने (२२९), एस.एम. लोटे (पो.उप.नि.), पो.हे.का. शेख (५०६), मपो.का. मुल्ला (६९५) यांचा समावेश होता. दोन पंचांसह ठरलेल्या ठिकाणी सापळा रचण्यात आला आणि संबंधित आरोपीला अटक करण्यात आली. संजय राया खरात (वय ३९, रा. पोफळी धनगरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून ५८८ ग्रॅम वजनाचा “गांजा” हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४६/२०२५ नोंदवण्यात आला आहे. गुन्हा एनडीपीएस कायदा १९८५च्या कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये २८ जून २०२५ रोजी पहाटे ३:३८ वाजता नोंदविण्यात आला.
ही यशस्वी कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सशक्त कार्यवाहीमुळे शक्य झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या प्रसारावर आळा बसण्यास मदत होणार आहे.