(मुंबई)
“ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी माझ्या घरासह एकूण १७० ठिकाणी धाडी टाकल्या. माझ्या ६ वर्षांच्या नातीचीही महिला अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तिला कॅडबरी चॉकलेट देऊन काहीबाही प्रश्न विचारले, हे त्यांनी सुडाच राजकारण केलं याचं उदाहरण आहे,” असा खळबळजनक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका कार्यक्रमात केला.
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात द्वेष नव्हता. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यात राजकीय मतभेद असले, तरी त्यांनी कधीही सूडाचं राजकारण केलं नाही. जांबुवंतराव धोटेंनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यावर वेळोवेळी टीका केली होती. मात्र, वसंतरावांनी कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही. वसंतरावांच्या निधनानंतर धोटेंनी ढसाढसा रडल्याची घटना सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचं स्मरण करून दिलं.”
“आज राजकारणात केवळ सूडाची भावना”
“सध्या सत्ताधाऱ्यांकडून सूडाचं राजकारण केलं जात आहे. संजय राऊत जास्त बोलतात म्हणून त्यांच्यावर खोट्या आरोपांची केसेस टाकून तुरुंगात टाकल. माझ्यावर तर अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात नाव गोवण्यात आलं. मात्र, त्या प्रकरणात परमवीर सिंह आणि सचिन वाझे यांचं नियोजन होतं हे समोर आलं. त्यामुळे आम्ही परमवीर सिंह यांची बदली केली, वाझे यांना सस्पेंड केलं. त्यानंतर परमवीर आणि वाझे या दोघांनीच माझ्यावर १०० कोटींचा आरोप केला.”
“कोर्टात ६ समन्स, पण पुरावे नाहीत“
“हे प्रकरण कोर्टात गेल्यावर मी स्पष्टपणे म्हटलं की, आरोप करणाऱ्यांना कोर्टात बोलवा. परमवीर सिंह यांना ६ वेळा समन्स पाठवण्यात आले. मात्र, ते न्यायालयात आले नाहीत. उलट देशातून पळून गेले आणि कोर्टात शपथपत्र सादर करून म्हणाले की, ‘मी केलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे नाहीत.’ यावरून लक्षात येतं की हा फक्त राजकीय सूड होता. ८ महिने मला जामीन मिळू दिला नाही, सतत न्यायधीश बदलले गेले, ५ न्यायाधीश बदलले, सुनावणीच होत नव्हती. शेवटी सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी माझी बाजू मांडली आणि मला बेल मिळाली. मी तब्बल १४ महिने तुरुंगात होतो.”
“चौकशीत माझ्या नातीलाही सोडलं नाही“
“ईडी, आयकर विभाग आणि सीबीआयने माझ्यावर १७० धाडी टाकल्या. चौकशीत इतकं पुढे गेलं की माझ्या ६ वर्षाच्या नातीचीही चौकशी झाली. तिला कॅडबरी देऊन प्रश्न विचारले गेले. मी समर्पण किंवा राजकीय तडजोड केली असती, तर मला ही सगळी चौकशी सहन करावी लागली नसती. पण मी तसा कोणताही समझोता केला नाही.”
“संजय राऊतांचा ‘सामना’चा मथळा आधीच समजायचा”
“मी संजय राऊत यांना भेटायला जात असे, तेव्हा ते काहीतरी लिहित बसलेले असायचे. मी विचारायचो – काय लिहिताय? ते म्हणायचे – उद्याचा सामना वाचा. मग दुसऱ्या दिवशीचा ‘सामना’ अग्रलेख जसाच्या तसा तिथेच दिसायचा. त्यांनी संपूर्ण यंत्रणा तयार केली होती. त्यांच्या आग्रहावरूनच मी आता पुस्तक लिहायला घेतलं आहे. संजय राऊत यांच्या प्रेरणेमुळेच मी लेखक झालो, असंही देशमुख यांनी सांगितलं.”