(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शासकीय आदेशांची पायमल्ली करत शिरगाव (ता. रत्नागिरी) येथे संपत्ती बळकावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवासी रविंद्र वैजनाथ दामले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पुष्कर माधव दामले (वय ५७, रा. डोंबिवली, मुळगाव शिरगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने कोर्टाच्या आदेशाने मिळालेल्या त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यातील मालमत्तेत बेकायदेशीरपणे अडथळा निर्माण केला.
फिर्यादी यांचा आरोप आहे की, २२ जून २०२५ रोजी सकाळी ७.०४ वाजता आरोपीने शिरगाव येथील सर्व्हे नं. ६२, हिस्सा नं. २-अ (२-१) या मिळकतीमध्ये जबरदस्तीने लोखंडी गेट बसवले आणि संरक्षक भिंत (गडगा) उभी करून त्यांच्या चारचाकी वाहनाचा रस्ताच अडवून टाकला. इतकेच नव्हे तर, ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करत सरकारी मोजणीच्या खुणाही नष्ट केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी यांना पाहताच आरोपीने “ग्रामपंचायतीने काढलेले गेट मी परत लावले आहे, कलेक्टर माझा माणूस आहे, तू इथून जिवंत कसा जातोस ते मी पाहतो!” अशी थेट धमकी दिली. या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा रजि. नं. २५७/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२६(२), २३८, ३२९(३), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.