( रत्नागिरी )
जयगड येथे इजिप्तहून कोळसा घेऊन आलेल्या ‘एम.व्ही. डाली’ या व्यापारी जहाजावरील ५१ वर्षीय फिलिपिनो सेकंड इंजिनीअर एलमीर अल्कारेज मोलीना हे अचानक बेशुद्धावस्थेत आढळून आले. तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही घटना २० जून रोजी रात्री जयगडजवळ समुद्रात उभ्या असलेल्या जहाजावर घडली.
सदर जहाज जे.एस.डब्ल्यू पोर्टपासून सुमारे ५ नॉटिकल मैल अंतरावर नांगर टाकून समुद्रात उभे होते. एलमीर मोलीना हे रात्री जेवणासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये गेले होते. मात्र बराच वेळ होऊनही परत न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅबिनकडे जाऊन पाहणी केली असता, ते बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले. सहकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले, परंतु ते शुद्धीवर आले नाहीत. त्यानंतर जे.एस.डब्ल्यू पोर्टच्या ‘भीम टग’ नौकेद्वारे त्यांना तातडीने पोर्टच्या जेटी क्र. ए-४ वर आणण्यात आले. तेथेच टगवर उपस्थित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
मयत एलमीर अल्कारेज मोलीना (वय ५१, रा. आरगाव, सेबू, देश – फिलीपिन्स) यांचा आकस्मिक मृत्यू कशामुळे झाला, याचा तपास सुरू असून, या प्रकरणी आमृ. क्रमांक १९/२०२५ नुसार भारतीय नौवहन सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस) कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.