(रत्नागिरी)
जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेला वेग मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी नव्या नशेच्या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. काही तरुण शीतपेयामध्ये मानसिक तणावावर वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या गोळ्या टाकून नशा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारावर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली असून, रात्री अकरानंतर मेडिकल स्टोअर्सना शीतपेय विक्रीस बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. नियम भंग करणाऱ्या विक्रेत्यांना तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहिम छेडली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार, कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या मोहिमेदरम्यान, या नव्या नशेच्या प्रकाराचा उलगडा झाला.
शीतपेयात औषधी गोळ्या मिसळून सेवन केल्यास नशा येते, हे लक्षात आल्यावर काही गटातील तरुणांमध्ये या प्रकाराबाबत मोठा ‘क्रेझ’ निर्माण झाला आहे. विशेषतः २४ तास सुरू असलेल्या मेडिकल स्टोअर्समधून रात्री उशिरा शीतपेय खरेदी करून हा प्रकार सर्रास केला जात असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
पोलिसांनी औषध विक्रेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून, “औषध विक्रीची परवानगी असताना शीतपेय व आईस्क्रीम विकणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाईल. रात्री अकरानंतर शीतपेय विक्री केल्यास कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला आहे.
यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, “नशेच्या या अनोख्या प्रकारामुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचे उपाय तातडीने अमलात आणले आहेत. नियम मोडल्यास कोणालाही पाठीशी घालणार नाही.” असे आवाहन करण्यात आले आहे.