( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरातील राजीवडा खाडी परिसरात मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. खाडीकिनारी नांगरून ठेवलेल्या मासेमारी बोटीला अचानक आग लागली. या आगीत बोटीसह बाजूला उभा असलेला टेम्पोही जळून खाक झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सदर मासेमारी बोट ही जावेद वस्ता यांची मालकीची असून, बोटीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. बोटीच्या जवळ वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक स्पार्किंग झाली. त्यातून निर्माण झालेल्या उष्णतेमुळे बोटीत आग लागली. आगीचा भडका इतका मोठा होता की काही क्षणांतच संपूर्ण बोट पेटून गेली. बोटीजवळ उभा असलेला टेम्पोही आगीच्या कवेत आला आणि तोही जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी बोट आणि टेम्पोवरील आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळाने अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली.
दरम्यान, आगीचे नेमके कारण व नुकसानाचे आकडे अद्याप स्पष्ट झाले नाहीत. मात्र ग्रामस्थांच्या माहितीनुसार अंदाजे १० ते १२ लाखांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे राजीवडा परिसरात एकच खळबळ उडाली असून मासेमारी व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे.