( रत्नागिरी /प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील मिऱ्या–नागपूर महामार्गावरील कोंडगाव येथील एक शेतकरी हायवे ठेकेदाराच्या बेजबाबदार कारभाराचा बळी ठरत असून, त्याच्या शेतीसह घरालाही पावसाचे पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे.
चंद्रकांत कृष्णाजी चिले यांच्या सर्वे नं. १४/३/१ मधील घर व शेती हे मोरीमुळे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी कोणतीही नैसर्गिक वहाळ नसताना ठेकेदाराने जबाबदारी टाळत चुकीच्या ठिकाणी मोरी बांधली, असा संतप्त आरोप त्यांनी केला आहे. पावसाचे संपूर्ण पाणी थेट चिले यांच्या शेतात सोडण्यात आल्यामुळे या वर्षीचा शेती हंगाम धोक्यात आला आहे. याच जागी त्यांचे घरही असून, घराची भिंत व पाया कमकुवत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “ही जबाबदारी नेमकी कोणाची?” असा जाब श्री. चिले यांनी प्रशासनाला आणि ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीला थेट विचारला आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत श्री. चिले यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार संगमेश्वर, प्रकल्प संचालक कोल्हापूर तसेच ग्रुप ग्रामपंचायत कोंडगाव यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना भर पावसात अशा कृत्रिम पुरांना सामोरं जावे लागणे, हे महामार्ग प्राधिकरण विभागाच्या दुर्लक्षाचे आणि ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीच्या मनमानीचे ज्वलंत उदाहरण आहे. आता तरी प्रशासन जाणतेपणाने या प्रकरणाची चौकशी करेल का? ठेकेदारावर कारवाई करेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीने निर्माण झालेला कृत्रिम पूर!
हजारो कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पात लाखो रुपये मोऱ्यांवर खर्च होत असतानाही, नियोजनशून्य कामांमुळे शेतकऱ्यांचे संसार वाहून जाण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. नियोजन नसलेल्या नाल्यांमुळे पावसाचे पाणी सरळ घरात आणि शेतीत उतरते, यावरून राष्ट्रीय महामार्ग वविभागाच्या डिझाइनमध्येच प्रश्नचिन्ह आहे, असे स्थानिकांचे मत आहे.