(मुंबई)
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकीकडे मनसेसोबत युतीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी दुसरीकडे पक्षाच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत “वेळ आल्यास सर्व जागांवर निवडणुका लढण्यास सज्ज रहा,” असा स्पष्ट आदेश दिला आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी “राज्याच्या मनात आहे तेच करू” असे सांगत मनसेसोबत युतीचे संकेत दिले. त्यानंतर लगेचच शिवसेना भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत, स्थानिक पातळीवर युती अथवा आघाडी करण्याच्या शक्यतांचा आढावा घेऊन एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा व संपर्कप्रमुखांना दिले. या अहवालाच्या आधारे पक्ष युतीबाबत निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
याशिवाय, विधानसभा निवडणुकीत अचानक ४० लाख नव्या मतदारांची नोंद कशी झाली, याचा तपास करण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांना दिले आहेत.
‘उद्धव-राज युतीबाबत अजून स्पष्टता नाही’
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का, याबाबतची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र “दोघे एकत्र येतील की नाही, हे सध्या सांगता येत नाही. राजकारणात योग्य वेळ येणे महत्त्वाचे असते,” अशी प्रतिक्रीया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.