(नवी दिल्ली)
भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत दरवर्षी लाखो उमेदवार सहभागी होतात. त्यापैकी अत्यल्प उमेदवार अंतिम यश मिळवतात. मात्र, मुलाखतीपर्यंत पोहोचूनही अंतिम यादीत न येणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी UPSC ने आता एक दिलासा देणारी योजना सुरू केली आहे. ‘प्रतिभा सेतू’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे, अशा अपयशी पण गुणवंत उमेदवारांना सरकारी आणि खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळणार आहेत. ही योजना कंपन्यांना आणि विविध संस्थांना थेट उमेदवारांशी संपर्क साधण्याची संधी देते.
‘प्रतिभा सेतू’ म्हणजे काय?
UPSC कडून पूर्वी अशा उमेदवारांची माहिती संबंधित संस्था व कंपन्यांना पाठवली जात होती. आता याच प्रक्रियेला अधिक औपचारिक आणि डिजिटल स्वरूप देण्यात आले असून, ‘प्रतिभा सेतू’ पोर्टलवरून उमेदवारांची माहिती थेट पाहता येणार आहे.
या पोर्टलवर नागरी सेवा, वन सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, अभियांत्रिकी सेवा, भूगर्भशास्त्रज्ञ, संरक्षण सेवा, आर्थिक व सांख्यिकी सेवा, तसेच वैद्यकीय सेवा परीक्षांमधून अंतिम यादीत न आलेल्या उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.
कंपन्यांनी कसा साधावा संपर्क?
‘प्रतिभा सेतू’ पोर्टलवर प्रवेश घेण्यासाठी कंपन्यांना खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागते:
-
गुगलवर upsconline.gov.in शोधा.
-
पोर्टलवर लॉग-इन पर्यायावर क्लिक करा.
-
नोंदणीसाठी ‘Private Organization’ हा पर्याय निवडा.
-
कंपनीने MCA पोर्टलवर नोंदणी केलेला CIN (Corporate Identification Number) प्राप्त करावा लागेल.
-
हा CIN क्रमांक ‘प्रतिभा सेतू’ पोर्टलवर प्रविष्ट केल्यावर कंपनीला उमेदवारांची माहिती मिळू लागेल.
या पोर्टलवरून उमेदवारांचा बायोडेटा, शैक्षणिक पात्रता, संपर्क क्रमांक यांसारखी संपूर्ण माहिती मिळणार आहे. UPSC ने म्हटले आहे की, सध्या या पोर्टलवर १०,००० हून अधिक उमेदवारांची माहिती उपलब्ध आहे. ही योजना केवळ नोकरीच्या संधीच नाही तर परीक्षेत अपयशी ठरलेल्या उमेदवारांना समाजात त्यांच्या ज्ञान व कौशल्याच्या जोरावर स्थान मिळवून देणारी आहे. सरकारी, स्वायत्त संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच खाजगी क्षेत्र यांना चांगले मनुष्यबळ उपलब्ध करून देणारा UPSC चा उपक्रम आहे.