(संगमेश्वर /प्रतिनिधी)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील वाहतूक कोंडीच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. संगमेश्वर बसस्थानकासमोरील अरुंद रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता येथे आता दोन वाहतूक पोलिस कायमस्वरूपी तैनात करण्यात आले आहेत. ही माहिती राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिस शाखेचे उपनिरीक्षक अनंत पवार यांनी दिली.
आरवली ते हातखंबा दरम्यान सध्या चौपदरीकरणाचं काम वेगात सुरू असून, संगमेश्वर नदीवर उड्डाणपुलाचे कामही सुरू आहे. मात्र, पुलालगतचा जुना मार्ग अरुंद असल्याने दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी होते आणि परिणामी वाहतूक ठप्प होते. विशेषतः सुट्टीच्या दिवशी आणि पावसाळ्यात ही समस्या चिघळते. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधी काही पोलीस कर्मचारी तात्पुरते पाठवले जात होते, परंतु त्यांची संख्या अपुरी ठरत होती. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने थेट दोन वाहतूक पोलिस कायमस्वरूपी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसाळ्यात धोके वाढतात
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, नागरिकांनीही नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे. संगमेश्वरकरांना आणि प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून, वाहतूककोंडीच्या समस्येत लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात महामार्गावर दरड कोसळणे, झाडे पडणे, खड्डे पडणे, रस्ता निसरडा होणे यामुळे अपघातांच्या घटना वाढतात. त्यामुळे वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आवाहनही उपनिरीक्षक पवार यांनी केले.
सुरक्षिततेसाठी २४ तास सज्ज व्यवस्था
• महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनासाठी रुग्णवाहिका, जेसीबी, हायड्रा मशीन आणि प्रशिक्षित कर्मचारी २४ तास कार्यरत
• आवश्यक ठिकाणी साईड पट्ट्या, वेगमर्यादा फलक, पॅनकॉर मिरर, वळवलेल्या मार्गांचे सूचनाफलक लावले
• ऑईल गळतीवर उपाय म्हणून वाळूची उपलब्धता सुनिश्चित
• महामार्गालगत असलेल्या नाल्यांची स्वच्छता
• वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, नियम उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार