(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक यशवंतगड किल्ल्यावर सुरू असलेली दुरुस्ती आणि पुनरुत्थानाची कामे सध्या अर्धवट अवस्थेत थांबली असून, या कामात असलेल्या बेफिकीर व निष्काळजी कारभारावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कामाच्या दरम्यान सुमारे साडेतीनशे फूट खोल खोदलेली बोरवेल उघडीच सोडण्यात आली आहे. त्याभोवती कोणतेही सुरक्षात्मक कठडे, चेतावणी फलक वा संरक्षक उपाय नाहीत. इतकेच नव्हे तर, दुरुस्तीत असलेली एक भिंत कोसळली असून ती अद्याप पडूनच आहे. कामकाज पूर्णपणे ठप्प असून, ठेकेदार आणि कामगारांचा मागमूसही नाही.
सरपंचांचा संताप
या गंभीर स्थितीकडे नाटे गावचे सरपंच संदीप बांदकर यांनी लक्ष वेधले असून, ठेकेदार व प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर त्यांनी रोष व्यक्त केला. “काम थांबले, बोअरवेल उघडी, भिंत पडलेली आणि परिसरात घाण पसरलेली – आणि ठेकेदारच गायब. हा प्रकार जनतेच्या जीवाशी खेळणारा आहे,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
कामगारही गायब, परिसरात घाण
कामगारांसाठी उभारलेली तात्पुरती निवासव्यवस्था अजूनही मोडकळीस आलेल्या स्थितीत आहे, आणि परिसरात निर्माण झालेली घाण साफ करण्यात आलेली नाही. यामुळे सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर धोका निर्माण झाला आहे.
ऐतिहासिक वारसा धोक्यात
अशा बेफिकीरपणामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि लहान मुलांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर यशवंतगडचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही दुर्लक्षित होतो आहे.
शासनाच्या नियमानुसार, बोअरवेल झाकणे, अर्धवट काम तात्काळ पूर्ण करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. मात्र त्याकडे पूर्णपणे जात असल्याचे चित्र आहे.
ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या भूमिकेची चौकशी, बोअरवेल झाकण्याची तातडीची कारवाई, तसेच कामाच्या गुणवत्तेची आणि खर्चाची तपासणी व्हावी, अशी ठाम मागणी केली आहे. यासंदर्भात ग्रामसभा, तहसील कार्यालय आणि पुरातत्व विभागाकडे तक्रार सादर करण्याची तयारी ग्रामपंचायतीने केली आहे. यशवंतगडच्या दुरुस्तीतील भोंगळपणा केवळ विकासकामांमध्ये हलगर्जीपणाच नव्हे, तर नागरिकांच्या जिवाला आणि ऐतिहासिक ठेव्याला धोका पोचवणारा ठरत आहे. यावर तात्काळ कारवाई न झाल्यास, पुढील अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.