( रत्नागिरी /प्रतिनिधी )
“शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी सर्जन जितका महत्त्वाचा, तितकाच भूलतज्ञही.” याच सिद्धांताला सत्यात उतरवत, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या नऊ महिन्यांपासून सातत्याने, थांबून न घेता, दिवसरात्र एकच झपाट्याने काम करणारे डॉ. विनोद कानगुले हे सध्या एकमेव भूलतज्ञ डॉक्टर म्हणून सेवा देत आहेत.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात काही काळासाठी भूलतज्ञांची पदे रिक्त होती. त्यामुळे अनेक अत्यावश्यक व नियोजित शस्त्रक्रिया रखडत होत्या. अशा काळात डॉ. कानगुले यांनी पुढाकार घेत संपूर्ण कार्यभार एकहाती स्वीकारला. त्यांनी केवळ भूल देणे इतक्यावर भूमिका सीमित न ठेवता, रुग्णाच्या प्रकृतीनुसार योग्य निर्णय घेणे, जोखमींचे व्यवस्थापन करणे आणि शस्त्रक्रियेनंतरच्या काळजीमध्ये सहभाग असे विविध पैलू ते तितक्याच तत्परतेने पार पाडतात. डॉ. कानगुले यांची एक खासियत म्हणजे, ते रुग्णांच्या नातेवाईकांशी वैद्यकीय विषयांबरोबरच माणुसकीच्या नात्याने संवाद साधतात. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये असलेली काळजी, भीती दूर करण्यासाठी ते कन्सल्टंट रूममध्ये स्वतः समजावून सांगतात, विश्वास निर्माण करतात. त्यांचा शांत, समजूतदार आणि विश्वासार्ह बोलण्याचा ढंग अनेकांच्या मनात आश्वासक ठरतो.
‘ड्युटी आवर’ नको; सेवेला वेळेचं बंधन नाही
आजच्या घडीला जिथे आरोग्यसेवेत वेळेच्या गणितांचा काटेकोर आग्रह असतो, तिथे डॉ. कानगुले ‘२४x७ सेवा’ ही संकल्पना कृतीत उतरवत आहेत. रात्री-अपरात्री कोणतेही इमर्जन्सी ऑपरेशन असो, ते तत्काळ हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून आवश्यक भूल प्रक्रिया पार पाडतात. त्यांच्या या सेवाभावामुळे कमी मनुष्यबळ असूनही, रुग्णालयातील ऑपरेशनची साखळी सुरळीत सुरू आहे.
साधेपणातून प्रेरणा देणारा आदर्श डॉक्टर
डॉ. विनोद कानगुले यांची सेवा ही केवळ त्यांच्या कर्तव्याची पूर्तता नाही, तर ती समाजासाठी प्रेरणादायी कार्याची जीती-जागती उदाहरणे आहे. त्यांचे शिस्तबद्ध, निःस्वार्थी आणि व्यावसायिक दृष्टिकोन यामुळे त्यांनी जिल्हा रुग्णालयात स्वतःचे एक विशेष स्थान निर्माण केले आहे. स्वतःच्या कार्याची प्रसिद्धी नको, की गवगवा… डॉ. कानगुले हे कमी बोलणारे पण अधिक करून दाखवणारे डॉक्टर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेबद्दल आरोग्य विभाग, सहकारी डॉक्टरवृंद, रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकडून मन:पूर्वक कौतुक होत आहे.