(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक घेरा यशवंतगड किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सध्या प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नुकतेच गडावरील एक जुनी संरक्षक दगडी भिंत अचानक कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही भिंत अनेक दशकांपासून अबाधित होती. मात्र, सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या निकृष्टतेमुळे ही घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
कामात गंभीर त्रुटी, संरक्षक भिंत कोसळली
ग्रामस्थांच्या मते, गडाच्या दुरुस्तीमध्ये जुन्या ऐतिहासिक दगडांऐवजी यांत्रिक पद्धतीने कापलेले, नवीन आणि दर्जाहीन जांभा दगड वापरण्यात आले आहेत. कोणताही पुरातत्त्व सल्लागार किंवा ऐतिहासिक वास्तुशास्त्रज्ञ यांचा सल्ला न घेता हे काम सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
स्थानिकांचा सहभागच नाही!
ग्रामस्थ, गडप्रेमी, तसेच नाटे व साखरी नाटे ग्रामपंचायतींना कामाच्या कोणत्याही टप्प्यावर विश्वासात घेण्यात आलेले नाही. “गड हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. पण या दुरुस्तीत ना आमचा सल्ला, ना आमचं आमंत्रण!” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
उद्घाटन, बॅनर, सूचनाफलकही नाहीत
इतिहास साक्षीदार असलेल्या गडावर दुरुस्तीचे काम सुरू असतानाही ना कोणतीही उद्घाटनाची माहिती, ना बॅनर, ना तांत्रिक फलक, आणि ना पर्यटकांसाठी कोणत्याही सूचना लावण्यात आल्या आहेत. “दोन कुंडी खोदल्या तरी बॅनर लागतात, पण गड दुरुस्तीच्या कामाची सुरुवात ‘गुपचूप’!” असे म्हणत याबद्दल ग्रामस्थांनी सवाल उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
या घटनेनंतर ग्रामस्थ, शिवप्रेमी आणि स्थानिक प्रतिनिधींनी खालील मागण्या लावून धरल्या आहेत:
- दुरुस्ती कामाची तांत्रिक आणि आर्थिक चौकशी करण्यात यावी
- पुरातत्त्व विभागाचा थेट सहभाग असावा
- स्थानिक नागरिक, अभ्यासक व लोकप्रतिनिधींच्या सल्लागार समितीची निर्मिती करावी
- गड परिसरात स्पष्ट सूचना, फलक व सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात
- काम करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी
भिंत कोसळल्यानंतर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना भविष्यातील संभाव्य अपघातांचा इशारा देणारी मानली जात आहे. गडावर पर्यटकांची वर्दळ असूनही, त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा संतप्त सूर ग्रामस्थानी आवळला आहे. घेरा यशवंतगड हे केवळ ऐतिहासिक स्थळ नाही, तर कोकणाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे या गडाचे जतन उच्च दर्जाचे, शास्त्रशुद्ध व पारदर्शक पद्धतीने व्हावे, अशी ठाम भूमिका स्थानिकांनी मांडली आहे.
घेरा यशवंतगड – आत्मगौरवाचं प्रतीक
घेरा यशवंतगड हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून, गावकऱ्यांचा आत्माभिमान आणि कोकणच्या परंपरेचा जिवंत पुरावा आहे. त्यामुळे याच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार, पारदर्शक व स्थानिक सहभागासह व्हावे, हीच ग्रामस्थांची ठाम मागणी आहे. “संवर्धनात जनतेचा सहभाग नसेल, तर तो फक्त कागदोपत्री विकास ठरतो!”
असे स्पष्ट मत अनेक गडप्रेमींनी व्यक्त केले आहे.