(बुलढाणा)
शिक्षण क्षेत्रातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळांतील घटती विद्यार्थ्यांची संख्या (पटसंख्या) आता थेट शिक्षकांच्या नोकरीवर बेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील २० शाळांतील ३५ शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, आणखी ६० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्हा परिषद शाळांतील गुणवत्तेत झालेल्या घसरणीमुळे आणि विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येमुळे शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या सातत्याने घटत असल्याचे निदर्शनास आल्याने, यासाठी जबाबदार धरत प्रशासनाने शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
प्रशासनाचा इशारा स्पष्ट
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या कारवाईची जबाबदारी स्वतः घेत कठोर पवित्रा घेतला आहे. “शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असताना शिक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ही कारवाई आवश्यक झाली,” अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शाळांतील शिक्षणाचा दर्जा ढासळल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना खासगी शाळांकडे वळवले आहे. परिणामी, जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. हे चित्र शिक्षण विभागासाठी चिंतेचं कारण ठरत असून, आता दोषी ठरणाऱ्या अकार्यक्षम शिक्षकांवर थेट निलंबनासारखी कठोर कारवाई केली जात आहे.
शिक्षक वर्गात खळबळ
या कारवाईमुळे शिक्षक वर्गात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक शिक्षक संघटनांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली असून, शिक्षणाच्या दर्जासाठी केवळ शिक्षकच जबाबदार आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.