(चिपळूण)
परतीच्या पावसाने मंगळवारी रात्रभर चिपळूणला झोडपले. या पावसात मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली. या घटनेमुळे दरडीकडील रस्त्याची संरक्षक भिंत व दरडीची बाजू धोकादायक झाली आहे. खबरदारी म्हणून त्या बाजूची वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. यामुळे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे गावालाही धोका निर्माण झाला आहे.
या घटनेची माहिती चिपळूण पोलिस आणि महसूल प्रशासनाला मिळताच अधिकाऱ्यांना परशुराम घाटात धाव घेतली. यापूर्वीही येथे भरावाचा काही भाग खचला होता. त्यानंतर खचलेल्या भागाची तातडीने डागडुजीही करण्यात आली होती. मात्र, पुन्हा त्याच ठिकाणी भराव खचल्याने परशुराम घाटातील मार्ग धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात याठिकाणी चोवीस तास देखरेख ठेवण्यात आली होती. तसेच दरड कोसळल्यास डंपर, जेसीबी, तैनात ठेवण्यात आले होते.
परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळून दर्डीचा भागही पूर्णपणे ढासळला आहे. त्याच ठिकाणी टेलिफोन केबल होती. मात्र, संरक्षक भिंत कोसळल्याने ती केबलही तुटली. अचानक नेटवर्क गेल्याने टेलिफोन एक्सचेंजचे कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना परशुराम घाटटात संरक्षक भिंत कोसळल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलीस यंत्रणा व महसूल विभागाला कळवले. त्यानंतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. परश्राम घाटातील संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना पाहता निकृष्ट दर्जाच्या कामाचे नमुने समोर आले आहेत. तर दुसरीकडे हा घाट धोकादायक असल्याचे दिसून येत आहे.
मंगळवारी पहाटे मुसळधार पाऊस सुरु असतानाच जोरदार आवाज झाला. परशुराम घाटात पावसाच्या सुरुवातीलाच मोठी दरड कोसळली होती. त्या ठिकाणची दरड अद्याप हटविण्यात आलेली नाही. आता पुन्हा त्याच ठिकाणापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. यावरून किती अक्षम्यपणे काम सुरू आहे. या सगळ्या गोष्टींचा चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही निषेध करतो. पेढे गावाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या कामाला गती द्यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी दिला आहे.
राजकीय नेते पोट ठेकेदार
परशुराम घाटात मातीचा भराव टाकून तयार केलेला रस्ता यापूर्वीही खचला आहे. या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली आहे. आता रस्त्याच्या खालील मातीचा भराव वाहून गेल्यानंतर घाटातील रस्ताच धोकादायक बनला आहे. घाटातील डोंगर कटाई, मातीचा भराव टाकणे आणि संरक्षण भिंती बांधण्याचे काम काही राजकीय नेत्यांनी पोट ठेकेदार म्हणून केले. राजकीय नेते आणि कार्यकर्ते हेच पोट ठेकेदार असल्यामुळे लोकप्रतिनिधीही शांत आहेत.