(नाशिक / प्रतिनिधी)
जगात तिसर्या महायुद्धामध्ये ढग जमा होऊ लागले आहेत. अशा काळात अखिल विश्वात शांतता, सौख्य अन् समाधान लाभावे आणि समस्त मानव समाजाचे कल्याण व्हावे या उदात्त भावनेतून सेवेकरी परिवाराने शांतीदूत बनून स्वामींचे सेवाभावी कार्य जनमानसात पोहोचवावे पोहचवावे असे विचार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी मांडले.
तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करुन आणि जयघोष करुन सारा आसमंत दुमदमून टाकला. त्र्यंबकेश्वर येथील श्री गुरुपीठाच्या प्रशस्त सभामंडपात शनिवार दि.28 डिसेंबर 2024 रोजी या वर्षीच्या शेवटच्या मासिक सत्संगाला सेवेकर्यांची अलोट गर्दी झाली होती. शनिप्रदोषच्या शुभपर्वावर परमपूज्य गुरुमाऊलींचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. परमपूज्य गुरुमाऊली श्री मोरे यांचे सभामंडपात आगमन होताच नेहमीच्या प्रथेप्रमाणे सेवेकर्यांनी हात उंचावून आणि जयजयकार करुन गुरुमालींचे सहर्ष स्वागत आणि अभिवादन केले.
आपल्या अमृततुल्य हितगुजातून गुरुमाऊलींनी अत्यंत प्रासादिक आणि रसाळ वाणीतून मूल्यसंस्कार, प्रश्नोत्तरे, कृषी, वास्तूशास्त्र, कायदा, याज्ञिकी, मानवी समस्या, आरोग्य, युवा प्रबोधन, आर्थिक प्रश्न अशा प्रमुख विषयांवर मार्गदर्शन केले. गुरुमाऊली आपल्या हितगुजात म्हणाले की, आज घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ निर्माण झाले तर नवीन वृद्धाश्रमे निर्माण होणार नाहीत आणि माता-पितांचे वार्धक्य सुखात जाईल. त्याकरिता गर्भ-शिशू-बाल आणि युवा संस्कार आपल्या पाल्यांवर होणे अत्यंत गरजेचे आहे.
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सेवामार्गातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहीद जवानांच्या मुला-मुलींच्या विवाह कार्यात सेवेकर्यांनी योगदान द्यावे अशी आज्ञा त्यांनी केली. मानवी समस्यांवर सेवामार्गाच्या सेर्व केंद्रांमध्ये अगदी विनामूल्य प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सेवा दिली जाते. या सेवेचा दु:खी, पीडित लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. श्री स्वामी समर्थ हा जनतेला चिंतामुक्त आणि समस्यामुक्त करण्याचा एक राजमार्ग आहे. या प्रवाहात सर्वांनी मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा असे सांगतानाच सेवामार्गाचे अठरा विभाग असून आवडेल त्या विभागात कार्य करा आणि स्वामींचे कार्य घराघरात पोहोचवा असे त्यांनी नमूद केले. मुला-मुलांची एकमेकांना पसंती असेल तरच कमी खर्चात विवाह करा. या विवाह संस्कार उपवर मुला- मुलींवर सक्ती किंवा जबरदस्ती करू नका अशी सूचनाही गुरुमाऊलींनी केली.
परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते मासिक सत्संगात श्री स्वामी समर्थ मासिकाच्या जानेवारी २०२५ च्या अंकाचे प्रकाशन आणि अकोला सेवा केंद्राने परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटलसाठी दिलेल्या रुग्णवाहिकेची लोकार्पण करण्यात आले. यावेळी गुरुपुत्र आ. श्री चंद्रकांतदादा मोरे, श्री नितीनभाऊ मोरे, श्री आबासाहेब मोरे यांनीही सेवेकऱ्यांना संबोधित केले.
किडणीच्या त्रासावर आयुर्वेदिक दवा –
परम पूज्य गुरुमाऊली आपल्या हितगुजामध्ये दरवेळी नवनवीन आयुर्वेदीक उपाय सांगत असतात. यावेळी त्यांनी किडणीच्या त्रासावर दवा सांगितला.
गुरुमाऊली म्हणाले, लिंबाच्या पाच सहा बियांमधील आतला गर, त्यासोबत कडीपत्त्याची पाच-सहा पाने आणि एक चमचा गोमूत्र हे सारे घटक सलग तीन आठवडे घेतल्यास किडणीचे विकार दूर होतात.