(रत्नागिरी)
सोमवार, १६ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. जिल्ह्यातील जवळपास २,४०० शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असून, शिक्षण विभागाकडून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
या दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात येणार असून, त्यांना नवीन पाठ्यपुस्तकं, गणवेश, बूट आणि पायमोजे असे शालेय साहित्य वितरित करण्यात येईल. स्वागत सोहळ्याच्या आयोजनासह शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. शिक्षण विभागाचे अधिकारी शाळांमध्ये भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासाठी नियोजन पूर्ण केले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाचे आगमन झाले असले तरी बाजारपेठांमध्ये लहान मुलांसाठी खास रेनकोट्स, छत्र्या, शालेय साहित्य यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः कार्टून चित्रांनी सजवलेले रेनकोट्स लहानग्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शाळांकडून विविध उपक्रम आणि विशेष स्वागताची तयारी करण्यात आली आहे.