( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
शहरातील भाजीगल्ली ते मच्छी मार्केट या मुख्य मार्गावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना दररोज या चिखलातून वाट काढत बाजारहाट करावा लागत आहे. पावसाळ्याची सुरुवात होताच या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
हा रस्ता बाजारपेठेतील एक महत्त्वाचा मार्ग असून, दररोज हजारो नागरिक व व्यापारी या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे आणि सतत होणाऱ्या वाहतुकीमुळे चिखलाचा कोंडाळा निर्माण झाला आहे. त्यामुळे महिलांना, वयोवृद्धांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी या दुरवस्थेवर नाराजी व्यक्त करत प्रशासनावर टीका केली आहे. “प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच रस्त्यांची ही अवस्था झाली आहे. कामे वेळेत आणि नीट न करता झाल्याने चिखल उगम पावला आहे,” असे एका नागरिकाने सांगितले.
दुकानदारांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ग्राहक कमी येत असल्याने व्यापारावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सद्यस्थितीत या रस्त्याचे नाले स्वच्छतेचे काम हाती घेण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.