(संगमेश्वर / प्रतिनिधी)
जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, संगमेश्वर तालुक्यातील देवधामापूर येथील लता राजाराम लिंगायत यांनी. वयाच्या ५२व्या वर्षी १२ वीची परीक्षा देत त्यांनी ६१ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांचे हे यश सध्या सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.
लता लिंगायत या सध्या देवरुख येथील अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून कार्यरत आहेत. नोकरी व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी मिळेल त्या वेळेत अभ्यास करून १२ वीची परीक्षा दिली. शिक्षणाची ओढ मनात असतानाही दहावीनंतर पुढे शिकता न आल्याची खंत त्यांच्या मनात होती. मात्र, ती खंत त्यांनी संधीमध्ये परिवर्तित केली आणि वयाच्या पन्नाशीत शिक्षणाची वाट पुन्हा धरली.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात १२ वीची परीक्षा देण्याचा निर्धार त्यांनी केला. अभ्यासासाठी वेळ मिळणे कठीण असतानाही त्यांनी हार न मानता सातत्याने प्रयत्न केले. अखेर त्यांचे हे श्रम फळास आले आणि नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत त्यांनी ६१ टक्के गुण मिळवले.
लग्नानंतर सौ. लता विजय देवधरकर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लता लिंगायत यांनी तब्बल ३०-३५ वर्षांनंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात प्रवेश करत यश मिळवले. उतरते वय, जबाबदाऱ्या आणि मर्यादा असूनही त्यांनी दाखवलेली जिद्द प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “वय हे केवळ एक संख्या आहे, शिक्षणासाठी कधीही उशीर होत नाही” हे लता लिंगायत यांच्या कार्यातून ठळकपणे अधोरेखित झाले आहे.