(रत्नागिरी)
शहरातील वाढत्या समस्या आणि नगरपरिषदेच्या निष्क्रिय प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ‘गैरकारभाराची वरात’ या नावाने भव्य मोर्चाचे आयोजन केले. दुपारी १ वाजता नगरपरिषदेपुढे धडक देत शेकडो नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण गटार बांधकामे, पावसाळ्यापूर्वीची रखडलेली कामे आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, महेंद्र गुळेकर आणि शहराध्यक्ष बाबय भाटकर यांनी केले. शहर सचिव गौरव चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनावर टीका करताना सांगितले, “निधी असूनही कामे होत नाहीत, यामागे केवळ अधिकार्यांची अकार्यक्षमता आणि अनास्थाच कारणीभूत आहे.”
मोर्चादरम्यान नागरिकांनी हातात फलक आणि बॅनर्स घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. “खड्ड्यांचा रस्ता, नगरपरिषदेचा धंदा”, “नाले भरले, अधिकारी गाफील”, अशा घोषणांनी परिसर दणाणला. साचलेल्या गटारांचे पाणी, रस्त्यांवरील खड्डे, उघडी नाल्या आणि वाहतुकीचा खोळंबा याबाबत नागरिकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
प्रशासनाला दिला अल्टिमेटम
मुख्याधिकारी गौरव गारवे यांच्याशी याआधी संपर्क करून भेटीचा प्रयत्न झाला होता, परंतु त्यांनी वेळ दिली नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. अखेरीस मोर्चादरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यामध्ये शहरातील समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून, “पंधरा दिवसांत ठोस कृती न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला.
प्रशासनाची झोप उडाली!
मनसेच्या या धडक मोर्चामुळे रत्नागिरी नगरपरिषदेवर आणि तिच्या कारभारावर पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांचे सावट गडद झाले आहे. आगामी काही दिवसांत प्रशासन जागे होते की, आंदोलकांच्या इशाऱ्याला वाऱ्यावर सोडते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.