( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
पत्रकारांसाठीच्या विविध योजनांच्या अटी आणि नियम अत्यंत जाचक असल्याने त्यात बदल करावेत अशी मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्याने करीत आलेली आहे.. सरकारने या मागणीची दखल घेऊन त्यामध्ये काही सुधारणा करण्याची तयारी दाखविली आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि सरकारचे आभारी मानत विविध योजनेतील नियमात काय काय बदल आम्हाला अपेक्षित आहेत याबाबत जिल्हा माहिती अधिकारी यांना मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्यावतीने शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले.
सन्मान योजनेची वयाची अट 58 वर्षे करावी आणि अनुभवाची अट 25 वर्षे करावी, सलग तीस वर्षे सेवा ही अट रद्द केली जावी. कारण श्रमिक पत्रकारांना नोकरी बदलताना काही दिवसाचा तरी ब्रेक घ्यावा लागतो. त्यामुळे आयुष्यभर पत्रकारिता करणारांची देखील 30 वर्षे सलग सेवा होत नाही. यामुळे अनेक पत्रकार योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे सलग सेवेची अट रद्द करावी. एक वर्षापर्यंत खंड पडलेला असला तरी ती सलग सेवा गृहित धरावी, ज्यांच्याकडे विनाखंड, सलग 30 वर्षे अधिस्वीकृती पत्रिका आहे आणि ज्यांचे वय 58 वर्षे आहे अशा पत्रकाराला सन्मान योजनेचा लाभ दिला जावा, महाराष्ट्रात असंख्य पत्रकार असे आहेत की, त्यांच्याकडे 30 वर्षांपुर्वीची कागदपत्रे मिळत नाहीत. त्यामुळे पत्रकार योजनांपासून ते वंचित राहतात अशा स्थितीत जिल्हा माहिती अधिकारी आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे शिफारसपत्र ग्राह्य समजले जावे, शिवाय संबंधित पत्रकाराचे प्रतिज्ञापत्र घेतले जावे. या अडचणीवर योग्य तो तोडगा काढावाच लागेल अन्यथा या योजनेचा लाभ खरया पत्रकारांना मिळणार नाही, अनेक साप्ताहिकाच्या प्रेस लाईनवर मालक, मुद्रक, संपादक, प्रकाशक म्हणून एकाच व्यक्तीचे नाव असते. मुद्रक अथवा प्रकाशक म्हणून नाव आहे म्हणजे तो पत्रकार अन्य व्यवसाय करतो असे नाही. ते फक्त सोयीसाठी असते. त्यामुळे प्रकाशक आणि मुद्रक म्हणून नाव असणारयांचा तो अन्य व्यवसाय आहे असे समजू नये. त्यालाही लाभ मिळावा, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीबाबत सुधारणा आदी विविध मागण्याचे निवेदन जिल्हा माहिती कार्यालयात सादर करण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदचे कोकण उपाध्यक्ष हेमंत वणजु, जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, राज्य अधिस्विकृती सदस्य जान्हवी पाटील, डिजिटल मिडीया जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान, सतीश पालकर, जमीर खलफे, सचिन बोरकर, तन्मय दाते आदी उपस्थित होते.