(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गोळप मानेवाडी परिसरात एक घर डोंगरधसका खाली सापडले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील दोन दिवसांपासून कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तालुक्यातील आडीवरे, महालक्ष्मी मंदिर परिसर, पावस बाजारपेठ या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
गोळप मानेवाडी येथे डोंगराची दरड घरावर कोसळल्याने काही दुचाकी वाहने मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. प्रसंगावधान राखत आठ घरांतील नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. महसूल प्रशासनाने या भागात सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेमुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, दरडग्रस्त भागात आपत्ती व्यवस्थापन पथक पाठविण्यात आले आहे. अधिक पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी डोंगरकडेला वसलेल्या भागात राहण्याचे टाळावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मावळंगे येथे घरावर झाड कोसळले
रत्नागिरी तालुक्यात गेले अनेक तास मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी साठवण्याच्या व झाड दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. भरपूर वादळी पावसामुळे मावळंगे येथील थुळवाडीतील श्री. संदेश थुळ यांच्या घरावर सकाळी आठच्या दरम्यान वाऱ्यामुळे नारळाचे झाड (माड) कोसळल्याची घटना घडली. गावातील लोकांनी सहकार्य करत पडलेले झाड हटवण्यासाठी प्रयत्न केले. झालेल्या आवाजामुळे वाडीतील अनेक लोकही जमा झाले. मात्र यामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचे समजते.