( नवी दिल्ली )
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता आरक्षित तिकीटांची प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) प्रवासाच्या २४ तास आधीच जाहीर करण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीमुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन पूर्वीपेक्षा अधिक सुकर होणार असून, तिकीट कन्फर्म होणार की नाही हे लवकरच कळणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ६ जूनपासून बीकानेर विभागात या प्रयोगाची सुरुवात झाली. अवघ्या चार दिवसांतच या उपक्रमाला प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. प्रयोग यशस्वी ठरल्याने लवकरच हा उपक्रम दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतील प्रमुख रेल्वेमार्गांवर लागू केला जाणार आहे.
प्रवाशांना काय फायदा होणार?
- प्रवासापूर्वी २४ तासच कन्फर्म यादी उपलब्ध असल्याने प्रवास रद्द करणे किंवा दुसऱ्या पर्यायांचा विचार करणे सोपे होईल.
- गोंधळ, अडथळे आणि वेळेवर होणारी फजिती टळणार.
- काही प्रवासी नवीन तिकिट बुकिंग किंवा अन्य साधनांनी प्रवासाचे नियोजन करू शकतील.
या प्रणालीमुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांची संख्या आधीच स्पष्ट होईल. जर प्रतीक्षा यादी मोठी असेल तर स्थानिक रेल्वे प्रशासन गरजेनुसार त्या गाडीला अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेऊ शकेल. रेल्वे मंत्र्यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे.
तात्काळ तिकिट बुकिंगमध्येही बदल – आता ‘आधार ओटीपी’ अनिवार्य
रेल्वेने तात्काळ तिकिट बुकिंग नियमांत मोठा बदल जाहीर केला आहे. १ जुलै २०२५ पासून तात्काळ तिकिट बुक करताना आधार आधारित OTP आवश्यक असणार आहे. यामुळे आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक नसेल तर तिकीट बुकिंग करता येणार नाही. या निर्णयामुळे बोगस बुकिंगवर नियंत्रण येण्यास मदत होणार असून, खऱ्या प्रवाशांना प्राधान्य मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
नवीन प्रणालीमुळे काय होणार?
रेल्वेच्या या निर्णयामुळे पारदर्शकता वाढणार, प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार, आणि प्रवासाचा अनुभव अधिक नियोजित होणार आहे. तसेच, तात्काळ बुकिंग प्रक्रियेत सुधारणा झाल्याने गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. तुमचं आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक आहे का? नसेल, तर १ जुलैपूर्वी ते जरूर करा, अन्यथा तात्काळ तिकीट बुकिंग थांबेल!