राजा रघुवंशी हत्याकांड ही याच विधानाची भयावह उदाहरण ठरली. इंदौरच्या प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील राजा आणि सोनम यांचं लग्न ११ मे २०२५ रोजी थाटामाटात पार पडलं. पण अवघ्या १२ दिवसांत, हनिमूनसाठी गेलेल्या या नवविवाहित जोडप्यांपैकी राजाचं प्रेत सापडतं आणि एक अकल्पनीय कटकारस्थान उघड होतं…
घटना कशी उलगडली?
राजा रघुवंशी – एका कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक, वडिलांच्या रघुवंशी ट्रान्सपोर्टचा वारस तर सोनम – प्लायवुड व्यवसायात सक्रिय, एका प्रतिष्ठित कुटुंबातील कन्या. २० मे रोजी दोघं हनिमूनसाठी मेघालयला गेले. सुरुवातीला कामाख्या मंदिरात जाण्याचं ठरलं होतं, मात्र अचानक सोनमने शिलाँग आणि चेरापुंजीला जाण्याचा आग्रह धरला. २३ मे रोजी मावलाखियात गावातील प्रसिद्ध डबल डेकर ब्रिज पाहून परतताना, सोनमनं राजाला वेई सावडोंग धबधब्याजवळ नेलं – आणि तिथंच झाला एका कटाचा अमानुष शेवट.
हत्या कशी घडवली गेली?
तपासात स्पष्ट झालं की, सोनमचं तिच्या भूतकाळातील प्रियकर राज कुशवाहाशी अजूनही संबंध होते. राज तिच्या वडिलांच्या प्लायवुड फॅक्टरीत काम करत होता. लग्नात अडथळा येऊ नये म्हणून कुटुंबीयांनी घाईघाईत सोनमचं लग्न राजासोबत लावून दिलं. सोनमनं राजासोबत मिळून तिघा सुपारी किलर – आकाश राजपूत, विशाल उर्फ विक्की ठाकूर आणि आनंद कुर्मी – यांच्यासह राजाच्या हत्येचा कट रचला. २३ मे रोजी सोनमनं राजाला धबधब्याजवळ नेलं. तिथे दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी राजाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने घाव घातला. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याच्या छाती व पाठीवर वार करून त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला.
तपासात उघड झालेली थरारक माहिती
-
सोनम ८ जून रोजी गाझीपूरमधील ढाब्यावर सापडली. तिने भावाला फोन केल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
-
पोलिसांनी तिला प्रियकरासमोर बसवून चौकशी केली.
-
४२ सीसीटीव्ही फुटेज, रक्ताचे डाग असलेलं जाकीट, रेनकोट, आणि इतर भक्कम पुरावे दाखवल्यानंतर सोनमनं गुन्ह्याची कबुली दिली.
-
हत्येनंतर सोनमने ‘सात जन्मों का साथ है’ अशी पोस्ट राजाच्या सोशल मीडियावर टाकून पोलिसांचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला.
-
पोलीस तपासात दिसून आलं की, सोनमने हॉटेलमध्ये जेवण केलं होतं – जरी तिने आपल्या सासूला एकादशी व्रत असल्याचं सांगितलं होतं.
पोलिसांच्या मते, सोनमचा उद्देश राजाला वाटेतून काढून टाकून राज कुशवाहासोबत नवीन आयुष्य सुरू करण्याचा होता. राजाचे वडील अशोक रघुवंशी आणि भाऊ सचिन यांनी सोनमसह सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सोनमच्या भावानेही तशीच मागणी केली. ही घटना केवळ एका तरुणाची हत्या नाही, तर विश्वास, प्रेम, विवाह आणि नव्या आयुष्याच्या स्वप्नांची हत्या आहे.