मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी असतो. दरवर्षी या दिवशी राज्यभरातून त्यांच्या चाहत्यांची, मनसे पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची शिवतीर्थावर मोठी गर्दी उसळते. मात्र, यंदा राज ठाकरे स्वतः वाढदिवसाच्या दिवशी मुंबईबाहेर असणार असल्यामुळे त्यांनी खास आवाहन करत मनसैनिकांना यंदा मुंबईत न येण्याची विनंती केली आहे. या पत्रात राज ठाकरेंनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नका असे आवाहन केले आहे. तसेच यामागील कारणही त्यांनी सांगितले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे:
तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो, सस्नेह जय महाराष्ट्र!
येत्या १४ जून २०२५ रोजी माझा वाढदिवस आहे. परंतु यंदा त्या दिवशी मी सहकुटुंब मुंबईबाहेर जाणार आहे, त्यामुळे आपली भेट होऊ शकणार नाही. अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो – मी वाढदिवस का साजरा करत नाहीये? काही विशेष कारण आहे का? – तर त्याचे उत्तर ‘नाही’. यामागे कोणतेही वेगळे कारण नाही. त्यामुळे या गोष्टीचे वेगवेगळे अर्थ काढू नयेत, ही नम्र विनंती.
गेली अनेक दशके माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सर्वजण भेटायला येता. त्या दिवशी प्रत्येकाशी सविस्तर संवाद साधता येत नाही, याची खंत असते. पण ही भेट, तुमचे प्रेम आणि तुमचा ऊर्जादायक उत्साह मला सदैव प्रेरणा देतो. गेली अनेक दशकं माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे जणं येता, तुमच्याशी त्या दिवशी बोलणं होत नाही, पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट हि ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर तुम्हा सर्वांच अफाट प्रेम ! आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढे देखील राहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्याची मला रुखरुख लागेलच!
पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचे दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही. माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन. त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या, असे राज ठाकरेंनी या पत्रात म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या या पत्रातून त्यांच्या कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या दिवशी न भेटता आल्याने खंत असूनही त्यांनी सर्वांशी स्पष्ट आणि मोकळा संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.