(मुंबई)
कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून सोमवारी सकाळी चार प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी स्पष्ट केले की, “ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. सध्या मेट्रो सेवेचे जाळे मर्यादित असल्यामुळे प्रवाशांवर लोकल ट्रेनचा प्रचंड ताण आहे. परिणामी अशा प्रकारच्या दुर्घटना होण्याचा धोका अधिक आहे.”
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्र सरकारसोबत सुरू असलेल्या चर्चांचा उल्लेख करत सांगितले की, “एसी लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. यासोबतच दरवाजे बंद ठेवण्याच्या प्रणालीचा विचारही सुरू असून, त्यासोबत योग्य व्हेंटिलेशनसाठीही उपाययोजना केली जाणार आहे.”
तातडीची पावले आणि वेळेत बदल
लोकलमधील वाढती गर्दी लक्षात घेता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने उपाययोजना करत सरकारी कार्यालयांच्या वेळा टप्प्याटप्प्याने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. “खाजगी कंपन्यांसाठी वेळेत तात्काळ बदल करणे कठीण आहे, कारण त्याचा थेट परिणाम त्यांच्या व्यवहारावर होतो. मात्र भविष्यात त्या संदर्भातही ठोस उपाय शोधले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सुरक्षेच्या उपाययोजना लवकरच
मुंब्रा दुर्घटनेनंतर प्रवासी सुरक्षेबाबत सरकार अधिक संवेदनशील झाल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचित केले की, लवकरच लोकल सेवेतील सुधारणा आणि प्रवासी सुरक्षेसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येईल.