(रत्नागिरी )
शहरातील कुवारबांव परिसरातील लक्ष्मीकेशवनगर (आरटीओ ऑफिस मागे) येथे ८ जून रोजी रात्री कौटुंबिक वादातून विवेकानंद विलास सावंत (वय ३८) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकानंद सावंत यांच्या पत्नीवर अपत्यप्राप्तीसाठी उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना कोणतेही काम किंवा मानसिक ताण न घेण्याची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे त्या काही काळ घरकाम करत नव्हत्या. याच कारणावरून विवेकानंद आणि त्यांच्या पत्नीमध्ये वेळोवेळी वाद होत असत. ८ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजता पुन्हा एकदा घरगुती कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादात संतप्त झालेल्या विवेकानंद सावंत यांनी पत्नी व त्यांची देखभाल करणाऱ्या नातेवाईकांना घराबाहेर पाठवले आणि दरवाजा आतून बंद केला.
नातेवाईकांनी तात्काळ ११२ या पोलीस हेल्पलाइनवर संपर्क साधत मदतीसाठी कॉल केला. पोलिसांनी सोसायटीतील स्थानिकांच्या मदतीने दरवाजा उघडला. घरात प्रवेश केल्यानंतर, विवेकानंद यांनी बेडरूममधील पंख्याला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. रात्री सुमारे १०.३० वाजता त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.