(रायगड)
पावसाळी मासेमारी बंदीच्या काळातही नियम झुगारून समुद्रात उतरणाऱ्या पाच मच्छीमार बोटींवर मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधित बोटी ताब्यात घेण्यात आल्या असून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
१ जून ते ३१ जुलै या कालावधीत पावसाळा आणि मासे प्रजनन हंगाम लक्षात घेता सरकारने मासेमारीवर बंदी घातली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही काही बोटी बंदीकाळात बिनधास्तपणे अरबी समुद्रात मासेमारी करताना आढळून आल्या. या प्रकारांमुळे बोटीवरील खलाशांचे प्राणही धोक्यात येत असून जीवितहानीच्या घटनाही घडत असतात.
यावर्षीही उरण, पेण आणि अलिबाग तालुक्यातील काही बोटी बंदी झुगारून खोल समुद्रात मासेमारी करत असल्याची माहिती मत्स्य विभागाला मिळाली होती. यासंदर्भात जागरूक पत्रकारांकडून अनेक वेळा आवाज उठवण्यात आला होता. अखेर मत्स्य परवाना विभागाने तात्काळ कारवाई करत ‘जय गौरी नंदन’, ‘एकवीरा माता’, ‘श्री जागृत गौराई’, ‘भवानी जगदंबा’ आणि ‘देवाची आळंदी’ या पाच बोटींना ताब्यात घेतले.
या कारवाईत एकूण लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, एका बोटीकडून १ लाख ३० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. विशेषतः यांत्रिक बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात जातात आणि त्यांची मासळी उरण व अलिबागच्या बाजारात रात्रीच्या वेळी विक्रीसाठी आणली जाते. या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, कल्याण, कर्जत आणि खोपोली येथील व्यापारी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी येत असल्याची माहिती मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून मत्स्य विभागाने यापुढे अधिक सतर्क राहण्याची मागणी करण्यात येत आहे, जेणेकरून बंदीकाळात होणारी अवैध मासेमारी रोखता येईल आणि समुद्री परिसंस्थेचे संवर्धन होईल.