(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक अमित यादव, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ लाड, रवींद्र सुर्वे, बाजी विश्वासराव, हर्षदा खानविलकर, प्राची शिर्के, डॉ. प्रतीक नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शनपर भाषण जगदीश पवार यांनी केले. समारंभात दहावी परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अथर्व मोरे याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले, तर इतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
राजापूर पोलीस ठाण्याचे नव्याने नियुक्त पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी विशेष पारितोषिक योजना राबवण्याचा प्रस्ताव मांडला आणि विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्षपदी निवड झालेले संजय ओगले यांचाही सन्मान करण्यात आला.
पदोन्नतीने एएसआय झालेले कमलाकर पाटील यांचा देखील यथोचित गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत अथर्व मोरे यांनी आयोजकांचे आभार मानले. पदाधिकारी, पालक व उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन संघाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम रीतीने केले होते. सूत्रसंचालन राजन लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद पवार यांनी केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला असून, अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि नव्या पिढीमध्ये आत्मभान जागृत होते, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.