(राजापूर)
शुक्रवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आडिवरे गावातील ओझर नदीला मोठा पूर आला असून, यामुळे गावात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुप्रसिद्ध महाकाली मंदिराच्या परिसरात पाणी साचले असून, मंदिराच्या पहिल्या पारिपायरीपर्यंत पाणी पोहोचले आहे. संपूर्ण परिसर जलमय झाला होता.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ३७ वर्षांनंतर प्रथमच इतक्या तीव्र स्वरूपाचा महापूर अनुभवायला मिळत आहे. रस्त्यालगत असलेल्या अनेक घरांत ६ ते ७ फूट पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या पुरामुळे रस्त्यालगतची दुकाने, स्टॉल्स वाहून गेले असून, वाडापेठ व रुंढे परिसरातही पावसाचा गंभीर फटका बसला आहे. पूरग्रस्त भागांतील अनेक घरातील अन्नधान्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्णतः नष्ट झाल्या आहेत. काही कुटुंबांनी घरं सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे.
तालुक्यातील भालावली, नवेदर, कोतापूर, कशेळी, धाऊलवल्ली यांसारख्या गावांमध्ये अनेक घरांत चार ते पाच फूटांपर्यंत पाणी शिरले असून नागरिकांचे अन्नधान्य, वस्त्र, घरगुती साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रमुख घटनांची झलक:
- धाऊलवल्ली भाटलेवाडी येथील पुल वाहून गेला.
- राजवाडी वाडा भराडे, भालावली मिरवणेवाडी, मोगरे सडेवाडी येथे दरडी कोसळल्या.
- नवेदर येथे दिनेश पांचाळ यांच्या घरात पाणी शिरले.
- कोतापूरमध्ये डांबरी रस्त्यांचे डांबर उखडून खड्डे तयार झाले.
- रिजवान मोनये यांच्या गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरून नुकसान.
- गणेशवडापाव शेड परिसरात पुराचे पाणी मध्यरात्री पोहोचले.
- गंगाराम जाधव यांच्या काजू फॅक्टरी शेजारील कुंपण कोसळले.
शासकीय यंत्रणा सतर्क
तालुक्यातील या आपत्तीजनक स्थितीमुळे प्रशासन सतर्क झाले असून, तहसीलदार विकास गंबरे यांनी गावागावांत तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रामस्थांची मागणी
पूरग्रस्त नागरिकांनी नुकसान भरपाईसाठी तात्काळ शासकीय मदतीची मागणी केली असून, पूरनियंत्रण यंत्रणेसही दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.