(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील निवळी बावनदी परिसरात काल (८ जून) दुपारी एक गॅस टँकर अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस प्रशासनाच्या वेळीच घेतलेल्या तात्काळ आणि परिणामकारक कृतीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईणकर, पोलिस अधिकारी नितीन ढेरे तसेच संपूर्ण पोलीस यंत्रणा घटनास्थळी तातडीने दाखल झाली. पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी हजर राहिल्याने यंत्रणेला अधिक गतिशीलता मिळाली. वाहतूक नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवणे या सर्व कामांवर पोलिसांनी ‘फास्ट ट्रॅक’वर काम करत उत्कृष्ट समन्वय दाखवला.
अपघातग्रस्त टेम्पोमधील जखमींना वेळीच मदत करण्यात आली आणि स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही वेळातच संपूर्ण परिसरातील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आली. त्यामुळे स्फोटासारख्या भीषण दुर्घटनेचा धोका टळला. स्थानिक नागरिकांनी पोलीस यंत्रणेच्या तत्परतेचे भरभरून कौतुक केले. “काल आम्ही पोलीसांमध्ये माणूस पाहिला, डॉक्टर पाहिला,” अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत .
मात्र या अपघातानंतर काही गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. गॅससारख्या धोकादायक वस्तूंची वाहतूक करताना कोणते नियम पाळले जातात? या संदर्भात सामान्य नागरिकांमध्ये अजूनही अनभिज्ञता आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेषतः निवळी घाट मार्गावर दररोज शेकडो ओव्हरलोड ट्रक भरधाव वेगाने जाताना दिसतात. या ओव्हरलोड ट्रकवर कोणतीही कारवाई होत नाही, हे चिंताजनक आहे. भविष्यात आणखी एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी यावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यासंदर्भात वाहतूक नियंत्रणावर लक्ष केंद्रित करत एक विशेष बैठक बोलवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्ता सुरक्षा समितीचे कार्यक्षमता प्रश्नांकित
जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे, मात्र तिचे कार्य केवळ वर्षातून एक बैठक घेणे इतक्यावरच मर्यादित आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. समितीच्या बैठकींमध्ये घेतलेले निर्णय प्रत्यक्षात कितपत अमलात आणले जातात, याची चौकशी आवश्यक आहे.
महामार्ग ठेकेदारांनाही जबाबदारीची जाणीव हवी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत महामार्गांच्या देखभाल आणि सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ईगल कंपनीसारख्या ठेकेदारांनी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार सूचना आणि तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होत असतात.