( मुंबई )
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ हे समीकरण ‘ठाकरे बंधू एकत्र’ होण्याच्या शक्यतेमुळे चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार का? या प्रश्नावर आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी दिलेले सूचक वक्तव्य चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले, “युतीबाबत कोणताही संदेश देणार नाही, थेट बातमीच देईन.” त्यांच्या या विधानामुळे मनसे-शिवसेना युतीच्या चर्चांना जोर चढला आहे.
राज ठाकरे यांनी अलीकडेच एका मुलाखतीत केलेल्या सूचक विधानामुळे मनसे-शिवसेना युतीच्या शक्यतेने पुन्हा रंग पकडला आहे. 2014 आणि 2017 मध्येही अशा चर्चा रंगल्या होत्या. यंदा मात्र दोन्ही पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मकता पाहायला मिळत आहे.
युतीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आता युतीबाबत कोणतेही संकेत देणार नाही. जी बातमी द्यायची आहे ती थेटच देईन.” त्यांच्या या वक्तव्यामुळे ही युती केवळ शक्यता नसून प्रक्रियेत असलेली ही बाब आहे, असे बोलले जात आहे. “शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. आम्ही काय निर्णय घेणार ते थेट जाहीर करू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की ते थेट बातमी देतील. त्यामुळे आता वाट पाहू या, नेमकी काय बातमी ते देतात.” तर अविनाश देशपांडे यांनी म्हटले आहे, “युतीचा ठोस प्रस्ताव आल्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. मात्र 2014 आणि 2017 सालीसुद्धा जनतेच्या मनात काही होते, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हते.”
शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले, “राज आणि उद्धव ठाकरे हे केवळ राजकारणातील नेते नाहीत, ते बंधू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. त्यामुळे सकारात्मक परिणाम जमिनीवर नक्की दिसेल.”
उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य, मनसे नेत्यांची प्रतिक्रिया आणि कार्यकर्त्यांमध्ये उमटलेली सकारात्मकता पाहता, मनसे-शिवसेना युती ही केवळ चर्चा राहणार नाही, तर लवकरच ‘बातमी’ म्हणून समोर येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनात आहे.