(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात ८ जून २०२५ रोजी जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरीय मूल्य संस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
घराघरात मूल्य संस्काराची चळवळ अधिकाधिक गतिमान व्हावी आणि त्यातून देशाला पुढे नेणारी सुसंस्कारित पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे दरवर्षी हिवाळी आणि उन्हाळी मूल्यसंस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्याशिवाय प्रत्येक सेवाकेंद्रात शिशू आणि बालसंस्कार वर्गही नियमितपणे घेतले जातात. त्यानुसार यंदा आठ जून रोजी प्रत्येक सेवाकेंद्रात मूल्यसंस्कार अर्थात बालसंस्कार शिबीर घेण्यात येणार आहे.
नितीनभाऊंच्या उपस्थितीत नरसोबावाडीला शिबीर
परब्रह्म भगवान श्री दत्त महाराज यांची राजधानी असलेल्या नरसोबावाडीमध्ये सेवामार्गाचे भव्य दत्तपीठ उभारण्यात आले आहे. या पुण्यक्षेत्री आठ जून रोजी सकाळी ११ वाजता श्री गुरुपीठाचे उपव्यवस्थापक, युवासंत,गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत मूल्य संस्कार शिबीर संपन्न होईल. शिशु संस्कार ,बालसंस्कार, युवा प्रबोधन , अभ्यासातील एकाग्रता, भावी आयुष्यात यश कसे प्राप्त करावे, जीवनात यशस्वी कसे व्हावे आदी महत्त्वाच्या विषयांवर गुरुपुत्र श्री. मोरे मार्गदर्शन करणार आहेत.
सरस्वती आणि मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा…
रविवार दि.८ जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी ५:३० या वेळेत सर्वत्र एक दिवसीय बालसंस्कार शिबिर पार पडेल.सकाळी आठच्या भूपाळी आरतीनंतर श्री विद्या सरस्वती पूजन आणि त्यानंतर मातृ- पितृ पाद्यपूजन सोहळा होईल. या सेवेनंतर प्रबोधनपर भगवान श्रीकृष्ण ,तेजोनिधी आणि गुरु प्रणालीवर नाटिका सादर केल्या जातील. त्यानंतर शिबिरार्थी मांदियाळीचा अर्थात प्रसादाचा लाभ घेतील. दुपार सत्रात १४ विद्या ६४ कलांचे दालन, सीड बॉल तयार करणे, वृक्षारोपण, रांगोळी, कथ्थक, भरतनाट्यम, वक्तृत्व ,निबंध स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, एक सेवेकरी पाच झाडे वृक्षारोपण व संगोपन, स्वसंरक्षण कला, दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पालकांचा सन्मान आणि अनुभव कथन असे बहुविध उपक्रम राबविले जाणार आहेत. तरी आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी सेवा केंद्रातील बालसंस्कार वर्गांमध्ये आणि मूल्य संस्कार शिबिरात त्यांना आवर्जून सहभागी करा असे आवाहन करण्यात आले आहे.