(संगमेश्वर / प्रतिनिधी)
सध्या सुरू असलेल्या पनवेल–कन्याकुमारी महामार्गाच्या कामात संगमेश्वर शास्त्रीपुल ते पुढील २ ते ३ किलोमीटर रस्त्यावर झालेली दुर्दशा सर्वांच्या नजरेस पडत आहे. त्यात भर म्हणजे, धो-धो कोसळणाऱ्या पावसात रस्त्याचे डांबरीकरण सुरू असल्याचे चित्र आहे, यामुळे शासकीय निधीची उधळपट्टी होत असल्याची जोरदार चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
प्रचलित नियमानुसार, पावसाळ्याच्या तोंडावर डांबरीकरणाचे काम थांबवले जाते. मात्र, संगमेश्वरात प्रत्यक्षात पावसातच मलमपट्टी केल्याप्रमाणे रस्ता डांबरीकरण सुरू असून, यावर “हे डांबरीकरण किती टिकणार, आणि विनाकारण शासकीय निधीचा विनाकारण अपव्यय का ” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
“सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या नियोजनशून्य व बेजबाबदार कार्यपद्धतीवर तीव्र टीका होत आहे. केवळ निधी खर्च करण्याच्या घाईत आणि कामाचा वेग वाढवण्याच्या नादात केलेले हे डांबरीकरण काही दिवसांतच खराब होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली जात आहे.”
स्थानिकांनी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. ढिसाळ नियोजन आणि नियमांचे उल्लंघन करून केलेले हे काम केवळ शासकीय पैशांचा अपव्यय ठरत असून, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन नागरिकांकडून होत आहे.