(रायगड)
किल्ले रायगड येथे होणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक सोहळा – २०२५ या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी विशेष वाहतूक बंदी आदेश जारी केला आहे.
ही वाहतूक बंदी ५ जून सायंकाळी ४ वाजल्यापासून ते ६ जून रात्री १० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा-नागोठणे ते कशेडी, तसेच माणगांव-निजामपुर, माणगांव-ढालघर फाटा आणि महाड-नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गांवर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून – पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई आदी भागांतून लाखो शिवभक्त रायगडाकडे मार्गस्थ होतात. याचसोबत आयोजकांचे साहित्य घेणारी वाहने आणि शासकीय यंत्रणांची वाहने देखील मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे या मार्गांवर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढतो.
वाहतुकीचा अडथळा टाळण्यासाठी आणि शिवभक्तांचा प्रवास सुकर व्हावा या हेतूने जिल्हा प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. ही वाहतूक बंदी दूध, औषधे, ऑक्सिजन, स्वयंपाक गॅस, भाजीपाला, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारी वाहने, तसेच रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांवर लागू राहणार नाही. जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी या बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित प्रशासन व पोलिस यंत्रणांना दिले आहेत.