(रत्नागिरी / वार्ताहर)
आपल्या मुलांवर आरोग्याचे आणि मानवतेचे संस्कार रुजवावेत, सामाजिक सलोखा राखा नाहीतर होणाऱ्या संघर्षातून पुढच्या पिढ्यांचीच राख होईल, त्यांची राख होण्यापासून वाचवा नाहीतर येणारा काळ कोणालाच माफ करणार नाही, असे मत स्काऊट गाईड शिक्षक प्रशांत जाधव यांनी व्यक्त केले.
सामाजिक सलोखा – शांतता बिघडविणाऱ्या घटकांमुळे शाळकरी मुलांच्या मनावर दुष्परिणाम होताना दिसतो त्यामुळे आपल्या घरातील, नात्यातील प्रत्येकाला हे समजावून सांगा की, हॉस्पीटलमध्ये गेल्यावर आपण जातीयवादी रक्त न पाहता जीव वाचवतो मग रस्त्यावर, समाजात आपण एकमेकांचे जीव घेण्याचे वातावरण का तयार करतो ? याबाबतची शिकवण शालेय वयातच रुजली तर पुढच्या पिढीत समाजिक सलोखा भक्कमपणे टिकून राहिल. मात्र असे न झाल्यास पुढच्या काळातील पिढ्या सलोखा राखणे कायमचे विसरून जातील यामुळे उभयच नव्हे तर बहुसमाज संघर्ष अटळ असेल.
पुढच्या पिढ्यांना अशा विनाशापासून वाचविण्यासाठी मानवतेचे संस्कार रुजविणे काळची गरज असल्याचे तसेच अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी गस्त वाढवावी असे शिक्षक प्रशांत जाधव यांनी यावेळी सुचविले. समाजिक सलोखा बैठकीत त्यांनी आपले विचार मांडले. रत्नागिरी शहरातील दैवज्ञ भवन येथे आयोजित या बैठकीला नूतन एसपी निलेश बगाटे, डिवायएसपी जयश्री गायकवाड यांसह अनेक मान्यवर समाजसेवक, पत्रकार नागरिक उपस्थित होते