( राजापूर )
अणुस्कुरा घाटात आज (बुधवारी) भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून पाचलकडे येत असलेली एक इर्टिगा कार अंदाजे १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली.
या दुर्घटनेतील मृत व्यक्तीची ओळख पटली असून कौस्तुभ विजय कुरुप (वय 30 रा. लांजा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या अपघाताची तत्काळ दखल घेऊन अनुस्कुरा घाटात तपास चालू केला असता कौस्तुभ विजय कुरुपचे मृत शरीर रस्त्याच्या दीडशे फूट दरीत व गाडी जवळपास 400 फुटावर आढळले.
याबाबत उपलब्ध माहितीनुसार, कौस्तुभ विजय कुरूप हा लांजा येथून ३ जून रोजी कोल्हापूरहून राजापूरच्या दिशेने येत होता. दरम्यान, तो पोहचला का, यासाठी रात्री त्याच्या आईने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या आईने लांजा पोलीस ठाण्यात कौस्तुभ बाबत माहिती दिली. याची माहिती मिळताच पोलीस त्याचा शोध घेत होते.
अणूस्कुरा घाटातील दाट धुक्यामुळे कौस्तुभला रस्त्याचा अंदाज आला नसावा आणि त्यामुळे त्याची कार थेट १५० फूट खोल दरीत कोसळली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात कौस्तुभ कारमधून बाहेर फेकला गेला. तो दगडांवर आदळत सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. रात्रीच्या वेळी मदत न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अणूस्कुरा घाटात झालेल्या या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. वाहनाचे अवशेष सर्वत्र विखुरलेले होते, तर कारचे इंजिन थेट रस्त्यावर येऊन पडले होते. मयत कौस्तुभचे पार्थिव काही अंतरावर पडलेले आढळले. या घटनेची कोणालाही कल्पना आली नाही, कारण घाटात प्रचंड धुके होते आणि दृश्यमानता अत्यल्प होती.
दरम्यान, घाटातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रस्त्यावर पडलेले इंजिन दिसून आले. त्याने तातडीने अणूस्कुरा घाटातील चेकपोस्टवरील पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर चेकपोस्टवरील पोलिसांनी घाटात जाऊन पाहणी केली असता अपघाताची गंभीरता समोर आली.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आणि लांजा पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळेही आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत स्थानिक ग्रामस्थांनीही मदतीसाठी धाव घेतली. मयत कौस्तुभचा मृतदेह खोल दरीतून वर काढण्याचे काम सुरू होते, मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. कौस्तुभ च्या निधनाची बातमी पसरताच लांज्यातून अनेक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.
लांजा पोलिस निरीक्षक श्री बगळे तसेच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव व त्यांची टीम घटनास्थळी दाखल होत पुढील तपास चालू केला आहे. मात्र अपघात नेमका कोणत्या वेळी झाला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, अणुस्कुरा घाटात मागील काही महिन्यांपासून वारंवार अपघात होऊ लागल्याने हा घाट वाहतुकीस धोकादायक बनल्याचे चित्र आहे.