(पाली / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा व मिऱ्या नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी ते अपूर्ण राहिल्याने येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तेथे वाहनांना रस्त्याच्या दुरावस्था असल्याने गैरसोय होऊ नये याकरिता महामार्ग वाहतूक पोलीसांकडून या दोन्ही मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येऊन त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे महामार्ग वाहतूक पोलीस रत्नागिरी विभागच्या पोलीस निरीक्षक दिपाली जाधव यांनी सांगितले.
याबाबत महामार्ग वाहतूक पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर पूल व शास्त्री पूल येथे दरड कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथे योग्य त्या उपाययोजनांची आवश्यकता तसेच याच महामार्गावरील संगमेश्वर ते बावनदी यादरम्यान रस्त्याच्या बाजूला बाजू पट्टी धोकादायक झाली असून या भागात रस्त्याला मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे या भागात अपघात वाढलेले आहेत. बावनदी येथील रस्त्याचे डायव्हर्जन व सर्विस रोड अपूर्ण आहे तसेच निवळी घाटामध्ये दिशादर्शक फलक, कॅटआय, बाजू पट्टीला रेडियम हे लावलेले नाही आहेत तसेच वाहनांना वेग नियंत्रित होण्यासाठी त्या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे व महामार्गाच्या बाजूला संरक्षण भिंती उभारण्याची गरज आहे तसेच या घाटात पावसाळ्यामध्ये दरड कोसळणे अपघात होण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी आवश्यक ती मशनरी सुसज्ज ठेवावी तसेच पाली बाजारपेठ, हातखंबा गाव, लांजा शहर, कुवे येथील खड्डे पडलेले सेवा रस्ते पूर्ण करण्याची गरज आहे या मुख्य बाजारपेठ असून या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यासाठी व त्या मार्गाने सुस्थितीत राखणे गरजेचे आहे.
तसेच पाली तीठ्यामध्ये मिऱ्या नागपूर व मुंबई गोवा महामार्गांच्या जंक्शन पॉईंट वर दिशादर्शक फलक व बॅरीकेड नसल्याने वाहनधारक विरुद्ध बाजूने येऊन वाहतूक कोंडी व छोटे अपघात होत आहेत त्यामुळे तेथे कातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच वेरळ घाटामध्ये जोड रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे तसेच घाटात वेग मर्यादा फलक, ब्लींकर, रेडियम लावणे गरजेचे आहे. हातखंबा गावातील दर्ग्या नजीक माती रस्त्यावर येण्याची शक्यता असल्याने तेथे योग्य त्या उपाययोजना करावेत.
निवळी गावानजीक महामार्गाच्या पुलाच्या एका बाजूस सेवारस्ता करणे आवश्यक आहे. मिरा नागपूर महामार्गावर आंबा घाटात दख्खन ते घाटातील गणपती मंदिरापर्यंत आवश्यकता उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच साखरपा येथे सेवारस्ता करणे व दाभोळे घाटात काम अपूर्ण असल्याने तेथे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने तेथे दुर्घटना घडू नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
पावसाळ्यात महामार्गावर आपत्कालीन परिस्थिती उद्भावल्यास त्या त्या कार्यक्षेत्रानुसार आपली आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवावी. कार्यक्षेत्रानुसार गस्ती पथके तयार करुन उपलब्ध साधन सामुग्री तयार ठेवावी. तसेच महात्वाचे ठिकाणी चालकासह क्रेन,जेसीबी उपलब्ध करुन ठेवावी जेणे करुन एखादेवेळी दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ पोहचता येईल व मदत करता येईल. तसेच त्यांचे संपर्क क्रमांक संबंधीत पोलीस ठाणे तसेच वाहतुक मदत केंद्र हातखंबा येथे कळविणेत यावेत असे महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राच्या वतीने सुचना देण्यात आल्या आहेत.
महामार्गांवरील सर्वेक्षण केलेल्या धोकादायक ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधित महामार्ग ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना सूचना केलेल्या असून त्यानुसार उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.