(मुंबई)
कोरोनाच्या संकटानंतर बंद झालेली आणि अद्यापही सुरू न झालेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांनी ही गाडी पुन्हा सुरू करण्यासाठी आता पुन्हा दंड थोपटले आहेत.
कोकण विकास समिती, जल फाऊंडेशन आणि विविध प्रवासी संघटनांकडून यासाठी सातत्याने पत्रव्यवहार आणि मागण्या करण्यात येत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने चाकरमान्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
पूर्वी ५०१०४/५०१०३ क्रमांकाने धावणारी ही दादर-रत्नागिरी पॅसेंजर सध्या केवळ दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावत आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना ही गाडी पकडण्यासाठी अतिरिक्त प्रवास करावा लागत असून, त्यामुळे वेळ आणि खर्च या दोन्हींची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पॅसेंजर सेवेचा लाभ अनेक चाकरमान्यांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्वाचा असून, त्यावर त्यांच्या रोजच्या जीवनमानाचा प्रभाव पडतो. तरीही कोरोना काळात स्थगित करण्यात आलेली ही सेवा अद्याप पूर्ववत करण्यात आलेली नाही.
पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांनी आता ही गाडी पुन्हा सुरू करण्यासाठी नव्याने मोहिम हाती घेतली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.