(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या कुवारबाव-साईनगर परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या एका थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या हत्याकांडाने संपूर्ण रत्नागिरी हादरून गेली आहे. पूर्ववैमनस्य आणि पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून २५ वर्षीय तरुणावर कोयत्याने तब्बल ३५ ते ४० सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुणाचा उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वीच त्याने हल्लेखोरांची नावे पोलिसांना सांगितल्याने पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
मृत तरुणाचे नाव सूरज राजाराम झोरे (वय २५) असे असून तो मूळचा विरार येथील रहिवासी होता. शिक्षणाच्या निमित्ताने तो रत्नागिरीत नातेवाइकांकडे राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबुल शेख उर्फ सोनू (सर्व रा. रत्नागिरी) यांच्याशी सूरजची जुनी मैत्री होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि जुन्या वादातून त्यांच्यात सतत धुसफूस सुरू होती. हाच वाद अखेर रक्तरंजित हत्याकांडात परिवर्तित झाला.
गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपींनी सूरजला दारू पिण्याच्या बहाण्याने कुवारबाव येथील सातबंगला परिसरात बोलावले. सुरुवातीला शांतपणे सुरू असलेली चर्चा काही वेळातच तीव्र वादात बदलली. संतापाच्या भरात आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने सूरजवर जीवघेणा हल्ला चढवला. आरोपींनी सूरजच्या मानेवर, हाताच्या नसांवर तसेच शरीराच्या विविध भागांवर अंदाजे ३५ ते ४० वार केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की परिसर रक्ताने माखून गेला. गंभीर जखमी अवस्थेतही सूरज कसाबसा साईनगर वस्तीजवळ पोहोचला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला पाहून स्थानिक नागरिकांची घाबरगुंडी उडाली. स्थानिकांनी तत्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सूरजला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल करताना सूरजची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याची अवस्था चिंताजनक बनली होती. मात्र, मृत्यूशी झुंज देत असतानाही त्याने पोलिसांना आपल्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे सांगितली आहे. त्याच्या या जबाबावरून पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत तिन्ही आरोपींना रत्नागिरीतून अटक केली. डॉक्टरांनी सूरजवर अतिदक्षता विभागात शर्थीचे उपचार केले. मात्र, शरीरातील मोठ्या प्रमाणावरील रक्तस्त्रावामुळे त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि शुक्रवारी (२२ मे ) दुपारी दोनच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला आहे.
या भीषण घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, शहर पोलीस निरीक्षक तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. दरम्यान, शहरालगत घडलेल्या या निर्घृण हत्याकांडामुळे कुवारबाव-साईनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

