(रत्नागिरी)
सायबर पोलिस व जिल्ह्याच्या टीमने तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करून जिल्ह्यातील नागरिकांचे एक-एक वर्षापूवी गहाळ झालेले मोबाइल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिस विभागाबाबत विश्वासार्हता वाढत आहे, असे प्रतिपादन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गहाळ होऊन हस्तगत करण्यात आलेल्या ७५ मोबाइलपैकी ३९ मोबाइल गुरुवारी संजय दराडे यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मोबाइल हरवला की नागरिकांना धक्का बसतो. त्यातील महत्त्वाची माहिती अज्ञाताच्या हाती लागली तर त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते. रत्नागिरी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाइल शोधून मूळ मालकांना परत केले आहेत. फक्त मोबाइलच नाही तर चोरी व इतर गुन्ह्यांमधील मौल्यवान वस्तूही न्यायालयाच्या आदेशाने नागरिकांना पोलिस विभागाकडून परत करण्यात येतात, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी रत्नागिरी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह पोलिस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रवासादरम्यान तसेच इतर ठिकाणी मोबाइल गहाळ व चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाइलचा सायबर शाखेमार्फत शोध घेण्यात आला. या मोबाइलचा तपास करून चोरट्यांकडून हस्तगत केलेले मोबाइल मूळ मालकांना परत देण्यात आले. जिल्ह्यातील ७५ मोबाइलपैकी ३९ मोबाइल परत देण्यात आले आहेत.