(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया २८ व २९ मे २०२५ रोजी पार पडली. या बदल्यांमध्ये एकूण २५८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
बदल्यांची ही प्रक्रिया जिल्हा पातळीवरील आस्थापना मंडळामार्फत राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड व प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती राधिका फडके यांनी सदस्य म्हणून सहभाग घेतला, तर कार्यालय अधीक्षक श्रीमती श्रद्धा तळेकर यांनी सदस्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली.
बदल्यांची ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनानंतरच पार पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमाचा योग्य विचार करून आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
या बदल्यांत ३० सहायक पोलीस फौजदार, ७२ पोलीस हवालदार, ४ पोलीस नाईक आणि ११३ पोलीस शिपाई यांच्या समावेशाने आंतरिक बदल्या करण्यात आल्या. याशिवाय, चालक संवर्गातील १५ हवालदार, १ नाईक आणि ११ शिपाई यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. आंतरजिल्हा बदल्यांत १ पोलीस हवालदार, २ पोलीस नाईक आणि ९ पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस कामकाजात नवचैतन्य येण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.