(रत्नागिरी)
जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त (३१ मे) रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची सातत्यपूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी अधोरेखित झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात २०१७ पासून या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवले जात असून, आतापर्यंत ७२,७२८ नागरिकांना तंबाखूजन्य पदार्थ सोडण्यासाठी समुपदेशन करण्यात आले आहे.
या कालावधीत एकूण ३७५ आरोग्य शिबिरे घेण्यात आली, ज्यामध्ये २३,४०४ नागरिकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातून ८९६ जणांमध्ये मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आली असून, १२६ रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान झाले आहे. सर्व रुग्णांची कर्करोग तज्ञांकडून तपासणी करून योग्य उपचार करण्यात आले आहेत.
या वर्षी जागतिक तंबाखू नकार दिनाची थीम “आकर्षणाचा मुखवटा उतरवूया : तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उदयोगांच्या क्लुप्त्या उघड करूया” अशी असून, तंबाखू कंपन्यांच्या मोहक जाहिरातींमागे लपलेले वास्तव लोकांसमोर मांडणे हा उद्देश आहे.
तंबाखूमुक्तीच्या दिशेने आणखी पावले टाकताना, जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच, कोटपा कायदा २००३ अंतर्गत कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या १७८६ व्यक्तींवर २,०९,३८० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
धूरमुक्त रत्नागिरीसाठी तालुकास्तरावर व गावस्तरावर अभियान हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनीही तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव ठेवून व्यसनांपासून दूर राहावे, तसेच तोंडात कुठलीही शंकास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
या अभियानामध्ये जिल्हा नोडल अधिकारी व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. यश प्रसादे, समुपदेशक प्राची भोसले व सामाजिक कार्यकर्ता सचिन भरणे यांचे योगदान आहे. तसेच, समुपदेशनासाठी जिल्हा रुग्णालयातील केंद्रांचा किंवा १८००११२३५६ या टोल फ्री क्रमांकाचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.