(संगमेश्वर)
पावसाळ्याची चाहूल लागण्याचा मुख्य संकेत असलेले रोहीणी नक्षत्र सुरू झाले असून, संगमेश्वर तालुक्यातील धामणी, गोळवली, तुरळ परिसरात शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत.
यावर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे पाऊस काहीसा वेगळ्याच पद्धतीने आला. एरवी जुलै महिन्यात येणारा जोरदार पाऊस यंदा आधीच अवकाळी रूपाने बरसला, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीपूर्व साठवण व पेरणीपूर्व तयारीची कामे रखडली. काही भागांत शेतात पाणीच पाणी झाल्यामुळे मशागत करण्यास अडचणी आल्या. अशा स्थितीत रोहीणी नक्षत्र सुरू होताच शेतकऱ्यांनी मात्र उशीर न करता शेतात उतरायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जात असली तरी काही ठिकाणी आजही बैलजोडींच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने नांगरणी होताना दिसते.
सध्या भातपिकाची तयारी जोमात सुरू आहे. शेतकरी बियाणे टाकण्यास सुरुवात करत असून, काही ठिकाणी शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य शेतात एकत्र काम करताना दिसत आहेत. “पावसावर भरवसा ठेवून नुसती वाट बघण्यात अर्थ नाही, त्यामुळे रोहीणीच्या सुरूवातीलाच काम सुरू केलं,” असं मत स्थानिक शेतकरी दत्तात्रय जाधव यांनी व्यक्त केलं.
यंदाचा पाऊस वेळेआधी आला असला तरी नंतरचा काळ मात्र अनिश्चिततेने भरलेला आहे. त्यामुळे शेतकरी काळजीपूर्वक आणि नियोजनपूर्वक शेती करताना दिसत आहेत. सरकारकडून वेळेवर खत आणि बियाण्यांचा पुरवठा होणे आणि हवामानाचा काहीसा सहयोग मिळणे गरजेचे आहे, असेही मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. पुढील काही दिवसांत पावसाची नियमितता टिकून राहिल्यास पेरणीची गती अधिक वाढेल आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.